एक परफेक्ट अभंग...

एकदा हृदयनाथ उर्फ बाळासाहेब मंगेशकर यांना प्रश्न विचारण्यात आला की नको देवराया, अंत आता पाहू या अभंगात बदल करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. बाळासाहेबानी चकित होऊन विचारले तेव्हा कळलं की खऱ्या अभंगामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या चरणाचे यमक जुळवलेले असते, म्हणजे मूळ अभंग नको देवराया, अंत पाहू आता, प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे असा असून त्यात चाल देताना एका शब्दाची जागा बदलली गेली. प्रश्न कर्त्याचा रोख त्यावरच होता.

लगेच विचार मनात आला की चला मिळतील तेवढे अभंग तपासून पहावेत. अभंगांची एक ठेवण आहे व जास्तीत जास्त अभंग याच पठडीतले आहेत. कमीत कमी शब्दात आपल्या संतांनी भक्ती, कर्मादी मार्ग मांडले आहेत. 

पण त्यात ही एक अभंग असा आहे की ज्यात दुसरे तिसरे चरण यमक जुळलेले आहेच शिवाय पुढच्या कडव्याची सुरवात मागच्या कडव्याच्या शेवटच्या शब्दाने केलेय, वा कसं सुचलं असेल हे? 

संत रामदास स्वामींनी लिहिलेला, स्व.राम फाटक यांच्या संगीत दिगदर्शनाखाली स्व. भीमसेन जोशी यांच्या सुमधुर आवाजाने नटलेला हा अभंग केवळ याचसाठी थोडा हटके आहे यात शंका नाही. 

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे

पावतसे महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां

उच्चारितां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी

पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां

कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास ह्मणे जना सावधान

अशीच थोडी करामत गदिमांनी इंद्रायणी काठी या गीतात केलीय, पहा तुमच्या लक्षात येते का?

Watch आरंभी वंदीन अयोध्येचा राजा..

अंतऱ्याचा मुखडा...

चॉकलेट हिरो देव आनंदचा गाईड हा All time super hit चित्रपट कुणाला माहित नाही? आर के नारायण यांची कथा, नवकेतनची अप्रतिम निर्मिती, विजय आनंदचं दिग्दर्शन, सर्वच कलाकारांचा समर्थ अभिनय, गीतकार शैलेंद्र व संगीतकार सचिनदा बर्मन यांची सगळीच्या सगळी सुपरहिट गाणी असलेला हा चित्रपट कोण विसरेल? 

या चित्रपटातील आज फिर जीने कि तमन्ना है गाण्याने मात्र कमाल केली. राजस्थानच्या पार्श्वभूमी वरील गाण्याचे एकंदर चित्रीकरण तर केवळ लाजवाब होते यात शंकाच नाही. जीने की तमन्ना असणारी वहिदा रेहमान बेभान होऊन नाचत असता केव्हाही पडेल की काय असं देव आनंद सारखंच आपल्यालाही वाटत रहातं..

आणखी एका कारणाने याच गाण्याने रसिकांच्या मनात काही काळापुरता का होईना संभ्रम निर्माण केला. कारण सर्वसाधारण गाण्यांप्रमाणे हे गाणे मुखड्याने सुरू न होता एकदम अंतऱ्याने म्हणजेच कडव्याने सुरू होते व आज फिर जीने कि तमन्ना है हा मुखडा नंतर येतो..

मागेपुढे याप्रकारची हिंदी गाणी आली असतीलच. फुलोंकी रंग से....लेना होगा जनम हमे हे किशोरचं असंच अवीट गाणं. मराठीतही, पावनेर ग मायेला करू... ओटी आईची मोत्यानं भरू सारखी अंतऱ्यानं सुरू होणारी गाणी आहेतच की ..

आजचं गाणं आहे अभिषेकी बुवांनी गायलेलं शांताबाईं शेळके यांचं हे बंध रेशमाचे या नाटकातील. 

शर्म आती है मगर...

अष्टपैलू गायिका आशाताई आणि संगीतकार आर डी बर्मन उर्फ पंचमदा यांचं अनोखं नातं सर्वानाच माहिती आहे. उत्तमोत्तम गाणी या जोडीने रसिकांना बहाल केली आहेत. 

तरीही आशाताईंची पंचमदां जवळ नेहमीच एक गोड तक्रार राहिली आहे ती अशी की पंचमदांची सर्वोत्तम गाणी लतादीदींनी गायली आहेत किंवा त्यांच्या वाट्याला आली आहेत. 

खरं तर हे भांडण म्हणा अथवा अन्य काही म्हणा, खूपच गोड आहे, पण आपल्याला विचार करायला लावणारं आहेच आहे. 

हिंदी चित्रपटातील गाणं हे विविध अंगांनी विचार होऊनच तयार होत असतं. पहिलं म्हणजे चित्रपटातील अभिनेता / अभिनेत्री कोण, दुसरं गाण्याचा प्रसंग, तिसरं गाण्याचा मूड, चौथं गाण्याची चाल / ढंग, आणि महत्वाचे म्हणजे या सर्वांना न्याय देईल अशा संगीतकाराच्या पसंतीच्या गायकाची निवड.

यावरून असं लक्षात येतं की गाणं कोण गाणार याचे पूर्ण अधिकार बहुतेक संगीतकार राखून ठेवत व त्याप्रमाणे ते निर्माता / दिग्दर्शक / कलाकार यांना पटवून देत. 

पंचमदांची लता दिदिंनी गायिलेली सर्व गाणी देणं येथे शक्य नाही, पहिलं पडोसन चित्रपटातील गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं, सुनीलदत्त सायराबानू वर चित्रित झालेलं व दुसरं बहारोंके सपने मधील मजरुह सुलतानपूरी यांच असंच एक मनाच्या कोपऱ्यातील गाणं..

चित्रपटातील नाट्यगीत...

मराठी हिंदी गाण्यांचे वेड आधी ट्रांझिस्टर व नंतर टेप रेकॉर्डर ने लावले. स्वतःचा टेप रेकॉर्डर घेतल्यानंतर प्रत्येक कॅसेटचे रेकॉर्ड कसे नीट ठेवायचे तेही मनात ठरलेलं होतं, ते प्रत्यक्षात कधीच आले नाही तो भाग वेगळा. 

नंतर कॉम्प्यूटर वर विविध गाणी कॉपी करून ठेवताना मात्र नीट फोल्डर तयार करूनच ठेवली गेली. आवडती हिंदी गाणी हि बरीचशी चित्रपटांतीलच, थोड्याफार गैर फिल्मी गझला. मराठीत मात्र चार फोल्डर - चित्रगीत, नाट्यगीत, भावगीत व भक्तीगीत. मग गाण्याचा प्रकार पाहून त्या त्या फोल्डर मध्ये कॉपी करायचं.

पण काहीवेळा विचार करायला लावणारं गाणं पुढ्यात यायचं. उदा. गदिमा / स्नेहल भाटकर / सुमनताई या त्रिकुटाचं अन्नपूर्णा चित्रपटातील तुझ्या कांतीसम रक्तपताका हे अजरामर गाणं चित्रगीत कि भक्तिगीत असा प्रश्न पडे व त्याचे नेमकं उत्तर सापडत नसे. 

असाच प्रश्न पडायला लावणारं 'मुंबईचा जावई' या चित्रपटातील ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं, बाबूजींच्या संगीताने नटलेलं व रामदास कामत यांच्या बहारदार पहाडी आवाजातील प्रथम तुज पाहता हे गाणं. चित्रपटातील नायकाचा भाऊ (अरुण सरनाईक ) नाटकात काम करत असतो. देखणे सरनाईक घरच्या प्रेक्षकांसमोर हे नाटकातील गीत सादर करतात म्हणून हे चित्रपटातील अस्सल नाट्यगीत.

साक्षात सरस्वतीचा अंश असलेल्या व प्रसंगानुरुप गीते लिहिण्यात हातखंडा असलेल्या गदिमां कडून अशीच नाट्यगीते लिहून घेता आली असती तर आणखी संगीत नाटके जन्माला आली असती असं उगाचंच वाटून राहतं...

Watch : प्रथम तुज पाहता