कृष्णरावांची लेक...

१९५९ सालच्या किचकवध या मराठी चित्रपटातील धुंद मधुमती रात रे, हे गाणं सर्वांनाच माहित आहे. गदिमांनी लिहिलेल्या या सुंदर गीताला संगीत दिलं होतं मा. कृष्णराव यांनी, हे कदाचित थोड्या लोकांनाच ठावूक असेल. 

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित मा. कृष्णराव (फुलंब्रीकर) मराठी संगीत नाटकांमधील गायक-अभिनेते तसेच संगीतकार होते. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी व इतर चित्रपटांतील गाणी खूपच गाजली..

सन १९३५ मध्ये कृष्णरावांना कन्यारत्न झाले, सुप्रसिध्द सिने-निर्माते व्ही शांताराम यांनी तिचे कौतुकाने उदयप्रभा असे बारसे केले. उत्तम सतारवादन करणाऱ्या व कवी-मनाच्या प्रभाताईंना वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला नसता तरच नवल..

सत्तरच्या दशकात त्यांनी संगीत दिलेल्या दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या व त्यांचा विक्रमी खप झाला. मराठी भावगीत प्रकारातील पहिल्या महिला-संगीतकार म्हणून एच एम व्हीं कंपनीने त्यांचा जाहीर सत्कार केला.  

कालांतराने श्री. रामचंद्र चिटको यांच्याशी विवाह केल्याने त्यांचे नामकरण सौ. वीणा चिटको असे झाले..

सहा महिने अपार मेहनत घेऊन पं. रामदास कामत यांना नाट्य गायनाबरोबर भावगीत गायनाकडे वळवत स्वरचित गीताला त्यांनी दिलेला स्वरसाज म्हणजे आजचे गीत...

Watch - अंबरातल्या निळ्या घनाची..

स्वरसम्राज्ञीची आवड

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची दोन नाटकं मला फार आवडतात एक - तुझे आहे तुजपाशी व दुसरं सुंदर मी होणार..

याच सुंदर मी होणार या नाटकावर आधारित चित्रनिर्माते श्री. वसंतराव जोगळेकर यांनी आज और कल नावाचा सुरेख हिंदी चित्रपट काढला होता. कृष्ण धवल तरीही सर्वोत्तम निर्मितीमूल्ये असलेला १९६३ सालचा हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी पाहायलाच हवा.

स्वातंत्र्याची पहाट उगवत असतानाची देशातील सामाजिक स्थिती व त्यामुळे विविध राजघराण्यात घडणाऱ्या घटनांवर व माणसांवर प्रकाश टाकणारं नाट्य अत्यंत समर्थपणे मांडताना हळूवार प्रेमाचं दुसरं अंगही खरोखर पाहाण्यासारखंच..

शारीरिक व मानसिकदृष्ट्या पांगळी झालेली राजकुमारी व तिच्यावर अनोख्या पद्धतीने उपचार करू पाहणाऱ्या डॉक्टरची हळूहळू फुलत जाणारी तरल प्रेमकथाही तितकीच अप्रतिम.

या चित्रपटाची आठवण काढण्याचं कारण म्हणजे आपलं आजचं गाणं..लता दीदींच्या आवडत्या निवडक गाण्यांपैकी एक असलेलं..

साहिर लुधियानवी यांचे शब्द, रवि यांचे संगीत व मोहंम्मद रफी यांचा सुरेल आवाज असा योग जुळून आल्यावर कुणालाही गुणगुणावसं वाटावं असं हे गाणं दिदिंबरोबरच रसिकांनाही नक्की आवडेल यात शंकाच नाही.