गाने गाने पर लिखा...

चित्रपट निर्माते बी.आर.चोप्रांचा १९५७ सालचा नया दौर हा चित्रपट त्यातील गाण्यांसह खूपच गाजला. पण त्याच वेळी काही कारणाने चोप्रा व सुप्रसिद्ध पार्श्वगायक महंमद रफी यांचे संबंध चांगलेच दुरावले व चोप्रांनी आपल्या संगीतकारांना रफी साहेबांना गाणी न देण्याची ताकीदच दिली. 

वक्त चित्रपटातील टायटल साँग व द बर्निंग ट्रेन मधील कव्वाली चा एखाद दुसरा अपवाद वगळता चोप्रांच्या चित्रपटातील बहुतेक गाणी गायचं भाग्य महेंद्र कपूर यांना लाभलं. यामध्ये धूल का फूल, गुमराह, हमराझ, वक्त, धर्मपुत्र, आदमी और इन्सान आदी चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेली सर्व गाणी सुद्धा हिटच झाली तो भाग वेगळा. 

सन १९७० च्या आसपास संगीतकार ओ.पी. नय्यर यांनी पण अचानक रफी साहेबांना गाणी देणं बंद केलं व आपल्या पुढल्या कारकिर्दीसाठी महेंद्र कपूर यांनाच आमंत्रित केलं. 

मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके यांनी देखील पहिल्या एक दोन चित्रपटांनंतर जयवंत कुलकर्णी यांच्या ऐवजी महेन्द्र कपूर यांचाच आवाज पसंत केला, म्हणतात ना गाने गाने पर लिखा है गाने वाले का नाम..

सन १९७२ मध्ये आलेल्या धुंद या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेले असेच एक कोपऱ्यातील गाणं. गीतकार साहिर लुधियानवी यांनी जीवनाचे सार सांगत चित्रपटाच्या टायटलशी जोडत केलेली शब्द रचना केवळ लाजवाब..