कवितेचं गाणं...

हिंदी सिने रसिकांना महेंद्र कपूर यांच्या गुमराह चित्रपटातील चलो एक बार फिर से गाण्याचं विशेष कौतुक आहे. कारण हे गाणं म्हणजे साहिर लुधियानवी यांची एक सुरेख कविता. ती चित्रपटाच्या कथेशी, प्रसंगाशी एवढी फिट बसली की ते एक छान चित्रपट गीत होऊन बसलं..

सुप्रसिध्द नाटककार श्री. वसंत कानेटकर यांनी अभिनेत्री/ गायिका आशालता वाबगावकरांना दिलेला शब्द संगीत मत्स्यगंधा नाटक लिहून खरा केला. या नाटकातील मस्त्यगंधेच्या मुलगी, आई व सासूच्या तिहेरी भूमिकेचे आशालता बाईंनी सोने केलेच पण पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या गाण्यांनाही योग्य तो न्याय दिला..

या नाटकातील एका प्रसंगात आपली प्रीतिकथा सखीला सांगताना अल्लड मस्त्यगंधा जे नाट्यगीत गाते ते म्हणजे आजचे आपलं गाणं..

हि पण खरं तर बालकवींची कविताच. पण नाटकातील प्रसंगात एकदम चपखल बसली. यातील चाफेकळी, वनमाला, यमुनेचे जळ, जललहरी, अर्धस्मित आदी शब्द रचना अचंबित करणारी.

जेमतेम अठ्ठावीस वर्षे आयुष्य लाभलेले बालकवी, श्रावणमासी हर्ष मानसी, आनंदी आनंद गडे, औदुंबर, फुलराणी सारख्या कविता रसिकांना देऊन गेले..